रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी – जांभूळआड येथे घराच्या चौथऱ्याची माती काढताना चौथऱ्याचा थर अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. घडली. विनायक शंकर चंदूरकर (वय ३५, रा. मेर्वी – जांभूळआड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी विनायक चंदूरकर हा इतर कामगारांसह अभिषेक तोडणकर (मूळ- रा. मुंबई) यांच्या मूळ घराच्या चौथऱ्याचे चर खोदत होता, चर खोदून वाळूमिश्रित माती घमेल्याने बाहेर टाकत असताना साडेचार फूट उंचीचा चौथरा विनायकच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने इतर कामगारांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विनायकला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.