राजापूर : सक्षम लोकशाहीची पहिली पायरी-मतदार नोंदणी आहे. त्यामुळे प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक राहून नवीन मतदान नोंदणीबरोबरच मतदार यादीतील दुरूस्तीबाबत, नाव व पत्ता बदलासह अन्य बाबींची पुर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडीत यांनी येथे केले.
राज्य निवडणूक विभागाकडून विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण-२०२३ अभियान हाती घेण्यात आले आहे. ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंंबर २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजाागृतीसाठी राजापूर महसुल प्रशासनाच्या वतीने गुरूवारी राजापुरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राजापूर नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या मेळाव्या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार सौ. पंडीत यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानांतर्गत नवीन मतदार नोंदणी, दुरूस्ती, दावे व अन्य प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले.
याप्रसंगी निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राजापूर शहरातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.