मुंबई : कोरोना व्हायरसमुळे येत्या काळात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या गणेशोत्सवावर सावट असलं तरीही हा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उत्सव साजरा करण्याच्या या निर्णयावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती ठाम असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे उत्सव साजरा होणार असला तरीही त्यामध्ये अत्यंत साधेपणा जपला जाणार आहे ही बाब मात्र अधोरेखित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीच हे अत्यंत महत्त्वाचं आवाहन करत सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यावर भर देण्याबाबतची विचारणा केली. यावेळी त्यांनी प्लेगच्या साथीदरम्यान अगदी साधेपणाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला दाखला दिला. बहुतांश प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या या आवाहनाचं समर्थनही केल्याचं म्हटलं जात आहे.
