रत्नागिरी : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूरला रवाना झाली.
या प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ गेल्या २६ सप्टेंबर रोजी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रात देवरूख परिसरातील माजी सैनिक मैदानी आणि लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. दररोज सकाळी ७ ते सव्वानऊ या वेळेत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. नियमित प्रशिक्षणार्थींना पौष्टिक आहार संस्थेमार्फत मोफत देण्यात येतो. पौष्टिक आहाराचा नित्य डाएट प्लॅन संस्थेच्या पदाधिकारी नेहा जोशी व ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी ठरवला आहे. या प्रशिक्षण वर्गात ८१ मुले-मुलींचा सहभाग आहे.
प्रशिक्षण केंद्रातील पहिली १७ मुलामुलींची तुकडी आणि त्यानंतर ६ मुलींची तुकडी जनरल ड्युटी आणि टेक्निकल पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनकडे रवाना होणार असल्याने या प्रशिक्षणार्थींकरिता शुभेच्छा समारंभ झाला. यावेळी माजी सैनिक पुंडलिक पवार, सूर्यकांत पवार, अमर चाळके, पांडुरंग शेंडगे, यशवंत खरात, सुनील जाधव, सुभाष मोरे, महेश सावंत, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर्मी अग्निवीर भरतीसाठी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि प्रशिक्षण प्रमुख माजी सैनिक अमर चाळके यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनीही प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल आदर व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 24/Nov/2022