यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पायावरच आजचा पुरोगामी महाराष्ट्र उभा : अजित पवार

0

मुंबई : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला.

कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलांना प्रोत्साहन दिलं. औद्योगिकरण, अर्थकारणाला आश्वासक दिशा दिली. समाजातील मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक या समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची संधी दिली. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणं आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारण, समाजकारणात कितीही उंचीवर पोहचले तरी त्यांची नाळ जनतेशी कायम जोडलेली होती. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेले ते नेते होते. साधी राहणी, कलेवर प्रेम, लेखन, वाचनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्यं होतं. महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना राजकारणात, समाजकारणा पुढे आणले. संधी दिली. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्य करणारे हजारो कार्यकर्ते त्यांनी घडवले. कृषी, शिक्षण, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले ते दूरदृष्टीचे नेते होते. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी त्यांनी केलेलं कार्य, दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे स्मरण केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 25/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here