रत्नागिरी : कोरोना काळात शाळेत नव्याने प्रवेश घेतलेले आणि ऑनलाइन वर्गांना हजेरी लावणारे विद्यार्थी यंदा प्रथमच शालेय सहलींची मजा लुटणार आहेत.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा राज्यातील सर्व शाळा जूनपासून पूर्ववत सुरू झाल्या.
आता थंडीची चाहूल लागताच शाळांना सहलींचे वेध लागले असून शालेय शिक्षण विभागानेही सहलींचे आयोजन करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मात्र त्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांची परवानगी आवश्यक असून पालकांकडून संमतिपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोनामुळे घरातूनच अभ्यास करणारे विद्यार्थी सहलीला मुकले होते. गेल्या वर्षी ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्यांना उशीर झाल्याने शिक्षण विभागाने शाळांना सहलीची परवानगी दिली नव्हती. यंदा मात्र शाळा जोमाने सहलीसाठीची तयारी करीत आहेत. मुंबईतील काही खासगी शाळांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहलीचे आयोजन केले आहे. याच महिन्यात शाळेत क्रीडा स्पर्धा, वार्षिक महोत्सवाचे आयोजनही करण्यात येते. करोनाकाळात शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी यंदा पहिल्यांदाच सहलीला जाणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सहलीत अपघात झाल्यास मुख्याध्यापक आणि शिक्षक जबाबदार राहणार आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वाच्या ठिकाणीच सहल काढावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारी निर्णयात शाळांनी सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. मात्र खासगी शाळांचा स्वतःच्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 26/Nov/2022