रत्नागिरी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकजण शिंदे गटात गेले मात्र रत्नागिरीचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी उद्धव ठाकरे गटातच कायम राहण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाकडून अनेक दिवस तालुकाप्रमुख पद देखील रिक्त ठेवण्यात आले होते मात्र बंड्या साळवी यांनी शेवटपर्यंत नकार दिल्याचे बोलले जात आहे. आता मात्र ना. उदय सामंत यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. बंड्या साळवी यांचे प्राबल्य असणाऱ्या मालगुंड पासून ते रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर पर्यंत ना. उदय सामंत यांनी मोठ्या राजकीय चाली खेळल्याचे दिसत आहे. रत्नागिरी क्रांतीनगर येथील रहिवाशांचा अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न ना. उदय सामंत यांनी एकाच झटक्यात मार्गी लावला आहे. शहरातील क्रांतीनगर येथील रत्नागिरी सहकारी गृह कुटीर संस्थेच्या ११६ घरांचा भाडेपट्टा करार ३० वर्षाकरिता वाढीव मान्यता व संबंधित घरांवरती बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी नगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्राचे वाटप राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते काल नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेला येथील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होते. क्रांतीनगरच्या इतिहासातील हि सर्वात मोठी सभा असल्याचे बोलले जात आहे. माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना हा मोठा धक्का असल्याचे आता बोलले जात आहे. या सभेमध्ये ना. उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले कि वचनपूर्ती झाली त्याचे सर्व नागरीकांना समाधान आहे. मागिल आठ दिवस पाठपुरावा केल्याने ३० वर्षाचे एक्सटेंशन मिळालं. ही घरे तुमचीच आहेत. याचा शिक्कामोर्तब करणारे पत्र मी आत्ता आणले आहे. प्रॉपर्टी कार्ड वर कर्ज मिळण्यासाठी एन. ओ. सी. देखील आणली आहे. सगळी घरे मंजूर, कुणाच्या मनात आले तरी घर काढुन घेऊ शकत नाही. सहका-यांना विनंती घराचा प्रश्न सुटलाय. ज्याने काम केलय त्याचे नाव सांगायची ताकद असली पाहिजे. काम झाले की हे काम पूर्वीच झालेले अशी प्रवृत्ती झाली आहे. हे काम शिवसेनेने केलय हे सांगण्याचे धाडस दाखवा. या भागात येताना कुणाच्या आधाराची आवश्यकता भासली नाही. स्वागतासाठी जनता जमलेली आहे, माझी जबाबदार समपलेली नाही. रोजगार मिळाला पाहिजे याकरिता अनेक निर्णय घेतले आहेत. भारती शिपयार्ड सुरु होतंय, वेरॉन कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतोय. प्रत्येक तरुणाला रोजगार निर्माण करुन देणार काम झाल आणि ते मीच केलय दुस-या कुणीही केलेले नाही. रस्त्यांचे प्रश्न, कोकणनगरचे प्रश्न, म्हाडा वसाहत सर्वांचे प्रश्न सोडवण्यात आलेत. आता तुमच्या घराच्या साध्या ची-याला देखील कोण हात लावू शकणार नाही. कार्यकर्त्यांनी ठरवले तर काम करु शकतात. दिपक पवार आणि सौरभ मलुष्टे यांचे कौतुक केलेच पाहिजे. सगळ्या गोष्टी यांनी केल्या, त्यांना आशिर्वाद द्यावेत. साळवी स्टॉप ला पाणपोई सौरभ मलुष्टे नी केली. दिपक पवार, सौरभ मलुष्टे यांनी महिलांना देव दर्शनाचा कार्यक्रम काढला होता. अशा संकल्पना धरून कुणीही आजवर काम केलेले नाही हे लक्षात ठेवा असे वक्तव्य ना. सामंत यांनी या सभेत केले.