रत्नागिरी : कोरोनाबाधित क्षेत्र असलेल्या पुणे-मुंबई महानगर क्षेत्रातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे सुलभ व्हावे, यासाठी मुंबई-पुण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा म्हाप्रळ, लाटवण मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुंबई-पुण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येताना नागरिक कशेडी घाटासोबतच म्हाप्रळ आणि लाटवण येथील मार्गांचा वापर करतात. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर होण्याच्या दृष्टिकोनातून म्हाप्रळ आणमि लाटवण येथील मार्गावर सर्वांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर केवळ कशेडी घाटमार्गेच नागरिकांना येता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले. हे मार्ग बंद होत असल्याने मंडणगड तालुक्यातून अत्यावश्यक सेवा वाहने व मालवाहू वाहने यांच्यासाठी पर्यायी मार्ग मंडणगडचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या समन्वयाने निश्चित करावा, असेही आदेशात म्हटले आहे.
