पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील आठवडा बाजार चौपदरीकरणाच्या कामामुळे बंद राहतो की, काय अशी शंका होती. मात्र, आजी-माजी सरपंचांच्या पुढाकाराने हा आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील आठवा बाजार हा दर बुधवारी पाली बाजारपेठ ते पाली तिठा या भागात भरतो. मुंबई-गोवा आणि रत्नागिरी-कोल्हापूर या दोन महामार्गावर हा बाजार रस्त्याच्या दुतर्फा भरतो. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर हा बाजार पारंपरिक पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली. सद्य:स्थितीत त्यांची व्याप्ती वाढली आहे. या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांचा मालही आणला जातो. त्यामुळे या बाजारात लाखोंची उलाढाल होते. स्थानिक शेतकऱ्यांनाही या बाजाराचा फायदा होत आहे. पाली बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाजार भरण्यासाठी जी जागा आवश्यक होती ती जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे आठवडा बाजार भरेल की नाही याविषयी साशंकता होती. मात्र, सरपंच विठ्ठल सावंत आणि माजी सरपंच संदीप गराटे यांनी पुढाकार घेऊन आठवडा बाजार पाली पोलिस दूरक्षेत्राच्या आणि दीक्षाभूमीच्या आवारात भरविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी दूरक्षेत्राच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यामुळे बाजार सुरळीत भरण्यास सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:06 13-12-2022