औरंगाबाद : आज शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या दरम्यान एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री हे सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. त्यात १४ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे.बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
