रत्नागिरी : जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची प्रक्रिया आजच पार पडली. राज्यातील सत्तांतर झाल्यावर शिवसेनेत उभी फुट पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटात गेले मात्र तरी देखील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सरस ठरल्याचे चित्र आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तो राखण्यात सध्या तरी उद्धव ठाकरे गटाला यश मिळाल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २२२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये ठाकरे गटाला १०१, शिंदे गटाला ४५, इतर ४७, भाजपा १७, राष्ट्रवादी ८, कॉंग्रेस ३, तर एका जागेसाठी अर्ज न आल्याने ती रिक्त राहिली आहे. युती आणि आघाडीनुसार पक्षीय बलाबल पाहता २२२ जागांपैकी मह्विकास आघाडीला ११२ ठिकाणी, युतीला ६२ ठिकाणी, गाव प्यानलला ४७ ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध करता आले आहे. एकंदर अर्ध्याधिक जागा मिळवत उद्धव ठाकरे गटाने जिल्ह्यात दणदणीत विजय मिळवल्याचे पहावयास मिळत आहे.