नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन समाप्त करण्याच्या योजनेबाबत केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवण्याची आवश्यकता असल्याचे असे मत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. देशातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणायची असेल तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने विश्वास ठेवण्याचीही गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशातील लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकरणात पारदर्शकता दाखवायला हवी होती. कोणते-कोणते भाग उघडले जातील आणि त्याचे निकष काय आहेत हे सरकारने समजावून सांगणे गरजेचे होते, असे राहुल गांधी म्हणाले.
