रत्नागिरी : कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेतली, तर मुंबई-पुण्यातून चाकरमान्यांना गावी आणण्याची भूमिका अत्यंत चुकीची आणि घातकी ठरेल, अशी भीती चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील लाखो चाकरमानी मुंबई-पुण्यात अडकले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावाची ओढ लागली आहे. जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी चाकरमान्यांना गावी पाठविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र या मागणीला माजी आ. कदम यांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या राज्य सरकार मुंबईतील चाकरमान्यांना गावी पाठविण्याच्या तयारीत आहे. मात्र कोकणात चाकरमानी आल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण होण्याचा संभव आहे. चाकरमानी आपलेच आहेत. केवळ भावनिक आणि राजकीय हितासाठी असे निर्णय उचित ठरणार नाहीत, असे कदम यांनी स्पष्ट केले.
