सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला यायला तसा थोडा उशीरचं झाला आणि ब्रह्मनाळला अनर्थ झाला. तुम्ही दोन दिवस आधी आला असता तर यंत्रणा अधिक सतर्कपणे कामाला लागली असती, असं म्हणत सांगलीकरांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सांगलीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याचे भान आपल्याला हवाई पाहणीनंतर आले असेल. कोल्हापूरपेक्षा गंभीर आहे. याकडे माध्यमांनी लक्ष वेधलं. मात्र आपण नेमलेल्या पालकमंत्र्यांनीच याकडे गंभीरपणे पाहिलं नाही, असं म्हणत सांगलीकरांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ही टिका करण्याची वेळ नाही पण ब्रह्मनाळमधील तान्ह्या बाळाचा आणि आजीच्या मृतदेहाचा फोटो पाहून सांगलीकर हळहळले आहेत. यापुढे पूर लवकर ओसरावा अशी प्रार्थना आपण करु, असंही सांगलीकर म्हणाले आहेत. आपल्या यंत्रणांकडून पूर परिस्थितीत सर्व सांगलीकर सुरक्षित राहतील एवढीच अपेक्षा आणि कृष्णामातेला शांत होण्याची सर्व सांगलीकरांची प्रार्थना, असं म्हणत सर्व सांगलीकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहण्यात आलं आहे.
