रत्नागिरी : रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पनवेलहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे सात डबे घसरून अपघात झाला. रुळ पूर्णतः तुटून गेलेले असून मोठे नुकसान झाले. हा अपघात दिवाणखवटी ते खेडच्या दरम्यान घडला आहे. दुपारच्या सुमारास दिवाखवटी येथे रत्नागिरीकडे येणार्या मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. डबे घसरल्याच्या आवाजाने आजूबाजूला काम करणारे काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात घडल्याची माहिती रत्नागिरी स्थानकातील भोंगा तीन वेळा वाजल्यामुळे लक्षात आली. त्यानंतर यंत्रणा कार्यान्वित होवून अपघातासाठी वापरण्यात येणारी व्हॅन घटनास्थळी रवाना झाली. कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र परराज्यातून येणारी मालगाडींची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. गुजरात येथून धान्य तर अलिबागमधून खतांचा पुरवठा केला जात आहे.
