मुंबई : लॉकडाऊनमुळं राज्यात अडकलेल्या मजुरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. परराज्यांतील मजुरांना रेल्वेनं त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे रेल्वे प्रवास तिकीट भाडे राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्कम देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळं परराज्यांतील लाखो मजूर राज्यातील विविध भागांत अडकले आहेत. आतापर्यंत हजारो श्रमिकांना त्यांच्या राज्यात रेल्वेतून सोडण्यात आले आहे. अजूनही हजारो श्रमिक राज्यात आहेत. मात्र, काही कुटुंबांकडे गावी जाण्यासाठी पैसे नाहीत. रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची रक्कमही ते भरू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. रेल्वे तिकीटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मागणीनुसार ही रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागानं शासन निर्णय काढला आहे.
