मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. यामुळे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचा निर्णय घेतला. केवळ पदवी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार असून अन्य वर्गांची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयानंतर युवा सेनेने अंतिम वर्षाची परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी केली आहे. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी केली आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावामध्ये आहे. परीक्षा कशा पद्धतीने होणार, कोणत्या वातावरणार होणार याचे टेन्शन विद्यार्थ्यांपासून त्यांच्या पालकांनीदेखील घेतलेले आहे. ही बाब निदर्शनास येताच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार महामारीची पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
