एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा, महापुरुषांचा इतिहास तरुणांना सांगा : अमोल कोल्हे

0

मुंबई : महापुरुषांवरुन सध्या सुरू असलेले वाद दुर्दैवी असून इतिहासावरुन एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास तरुणांपर्यंत पोहचवण्याची गरज असल्याचे मत खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संभाजी महाराजांच्या धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक या वापरण्यात आलेल्या बिरुदावलीवर कादंबरीकार विश्वास पाटील यांनी घेतलेला आक्षेप योग्य नाही. स्वराज्यरक्षक ही बिरुदावली अधिक व्यापक आहे. पाटील यांनी उपस्थित केलेल्या वादावर अधिक बोलायचे नाही. आपल्यालाही त्यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. पण इतिहासावरुन वाद निर्माण करण्यापेक्षा तो लोकांपर्यत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे.” आपण कोणाच्याच शिवभक्तीवर शंका घेत नाही, महाराजांचे कार्य कोणत्याही मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असून अशा वादावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण कृतीला महत्व देत असल्याचे कोल्हे म्हणाले.

तसेच महाराजांबद्दल बोलण्यासाठी नियमावली तयार केली जावी, अशी संसदेत मागणी केली आहे. इतिहासावर अभिनिवेशाने बोलण्याऐवजी अभिमानाने बोलण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. महापुरुषांना राजकारणात ओढू नये. बेरोजगारी, महागाई , स्रियांची धोक्यात आलेली सुरक्षा या मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवून या गोष्टीना अकारण महत्व देणे चुकीचे आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले. शरद पवारांना जाणता राजा मानता का? या प्रश्नांवर अमोल कोल्हे म्हणाले की, जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या अर्थाने पवार यांचा उल्लेख होत असेल तर तर तो चुकीचा आहे. तो त्यांना स्वतःलाही मान्य नसेल. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. जाण असलेले नेतृत्व या अर्थाने ही उपाधी वापरली जात असल्यास हरकत नाही.

जाण असलेले नेतृत्व

शरद पवारांना जाणता राजा मानता का? या प्रश्नांवर अमोल कोल्हे म्हणाले की, हे प्रत्येकाचे मत आहे. दुर्दैवाने आम्ही फक्त प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतिहास पोहोचवण्याची कृती करायला हवी. मी एक गोष्ट मानतो की, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहे. माणसाच्या जन्मात येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवाच्या रुपात पोहोचता येतं, याचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अशी जर कुणी इतरांची तुलना करत असेल, तर स्वतः पवार साहेब सुद्धा ही गोष्ट अमान्य करतील. पण, सगळ्या परिस्थितीची माहिती असलेला, जाण असलेले नेतृत्व या भावनेतून म्हटलं असेल तर ती जाण असणं, ही गोष्ट वाईट नाही, असे म्हणत त्यांनी भुजबळांचे समर्थन केले आहे.

नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तपोवनातील मोदी मैदानावर लागणार आहेत. यासाठी शिवपुत्र संभाजी महानाट्यात स्थानिक कलावंतांनाही काम करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी आज जानेवारीपासून निवड आणि प्रशिक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी नाशिकच्या अनेक कलाकारांचा सहभाग या महानाट्यात नाशिककरांना पाहायला मिळणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 06-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here