रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात अंघोळ करताना अचानक आकडी आल्याने प्रौढाचा मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार, दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप विठ्ठल कुरटे (४८, रा. वरची निवेंड-पातेवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो गणपतीपुळे येथील समुद्रात अंघोळ करत होता. त्यावेळी त्याला आकडी आल्याने त्याच्या नाका-तोंडातून फेस येऊ लागला. तो पाण्यात जोरजोरात हातपाय मारून बुडत असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्या नंतर देवस्थानच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुरटे याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 07-01-2023