मुंबई : राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल केला. तर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार झाले म्हणून अभिनंदन करण्यात आले आहे. ”आमदारकीचे टेन्शन संपले, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन”, असं ट्वीट करत महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि मुंबईतील कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.
