‘पीएमजीकेवाय’चे मोफत धान्य बंद : साखरेसाठी मोजावे लागणार पैसे
मुंबई : कोरोना महामारीदरम्यान गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) सुरू केलेली मोफत धान्य योजना ३१ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे; परंतु त्याऐवजी आता नियमित धान्य योजनेतून देण्यात येणाऱ्या रेशनच्या गहू व तांदळाचे मोफत वाटप केले जाणार आहे.
त्यासाठी एक रुपयादेखील मोजावा लागणार नाही. १ जानेवारीपासून ही योजना सुरू केल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे. कोरोना महामारीचे संकट सलग दोन वर्षे कायम होते. त्यामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली आहे. अजूनही या संकटातून हजारो कुटुंबे बाहेर पडू शकले नाहीत. रोजगार गेल्याने कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजा कशा भागवाव्या, शाळेचे थकीत शुल्क कसे भरावे, मुलांना दोन वेळचे पोटभर अन्न कुठून आणावे, असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.
देशात कोरोना महामारीदरम्यान गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोफत धान्य, शिवभोजनद्वारे एकावेळचे मोफत जेवण देण्यात आले. केंद्राने मोफत धान्य योजनेला दोन वेळ मुदतवाढ दिली. मात्र, ३१ डिसेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. याऐवजी नियमित धान्य योजना म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ दिले जाते. ते आता मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही. मात्र, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना मिळणाऱ्या १ किलो साखरेसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. साखर मोफत मिळणार नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 09-01-2023