रत्नागिरी : उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोरपणे नियोजन व पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे चार गुरुवारी विविध भागात पाणी कपात करण्याचा निर्णय एमआयडीसीतर्फे घेतला आहे. महामंडळामार्फत पालिकेच्या काही भागासह बारा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीमध्ये काजळी नदीतील पाणी साठा अतिशय कमी झाल्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणी पुरवठा करणे अशक्य होते आहे. तसेच उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या महामंडळाने पाणी पुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले असून १४ मे २०२० पासून प्रत्येक गुरुवारी पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. १४ मे, २१ मे, २८ मे व ४ जून रोजी पाणी पूर्णपणे बंद राहील, याची नोंद घ्यावी, असे एमआयडीसीतर्फे सांगण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून पाण्याचा वापर काटकसरीने करावा. त्यादृष्टीने ग्रामस्थांनी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी विभाग यांनी केले आहे.
