मुंबई : लॉकडाऊनमुळं राज्यातील पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली. गेले जवळपास दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच राज्यात एक हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना काही दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. शिवाय, अनेक पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. सध्या रमजानचा सणही सुरू आहे. अशा स्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचंही आव्हान आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं केंद्राची मदत मागितली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:02 PM 13-May-20
