◼️ वातावरणातील बदल आणि घटत्या उत्पादनांमुळे बागायतदारांची मागणी
रत्नागिरी : बदलत्या वातावरणाने गेली पाच वर्षे आंबा उत्पादनात सातत्याने घट होत आहे. यासाठी आंब्यावर होणाऱ्या वातावरणातील बदलाचे परिणाम जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार खबरदारीचे उपाययोजना सुरू करण्यासाठी आंबा संशोधन केंद्राची मागणी बागायतदारांनी केली आहे.
याबाबत लवकरच जिल्हा प्रशानाबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. आंबा उत्पादन हे एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने घटलेले प्रमाण हे चिंता वाढवणारे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत ठोस उपाययोजनेसह फळधारणेची घट याबाबत कारणमीमांसा होण्याबाबत ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी सर्वच बागायतदारांनी लावून धरली. बागायतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच हापूस आंबा संशोधन केंद्र मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बागायतदारांना दिले आहे.
गेली चार-पाच वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच या परिसरात बागायतींमध्ये फळधारणेचे प्रमाण सातत्याने घटत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली.
याबाबत कृषी खात्यासह पर्यावरण खात्याकडे त्यांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार या तक्रारीची दखल घेऊन अलीकडेच बागायतदरांची बैठक झाली. याबैठकीत प्रशासनाबरोबरही याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आश्वासन कृषी विभागाने दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 18-01-2023