मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांचं विधानपरिषदेचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांचं तिकीट कापण्यामागे प्रदेशपातळीवरच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षानं काय दिलं नाही? ७ वेळा आमदारकी, दोनदा मंत्रिपद आणि सूनेला खासदारकी दिली. त्यामुळे त्यांना आणखी किती द्यायचं? कितीही दिलं तरी ते पक्षाच्याविरोधात बोलतातच. असा विचार करूनच केंद्रीय नेतृत्वाने नाथाभाऊंना तिकीट नाकारलं असावं, असं सांगतानाच पार्टीत काम करणं म्हणजे आमदारकीच का? जनतेत फिरून त्यांच्या अडचणी समजून घेणं हे काम नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मंदी असते तेव्हा मुंगी होऊन साखर खाणं आणि नम्र राहणंच योग्य असतं, असा सल्लाही पाटलांनी खडसेंना दिला. खडसेंनी पक्ष वाढवला हे मान्य. पण त्यांना सातवेळा आमदारकी दिली. दोनदा मंत्रिपद दिलं. त्यांच्या मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमनपद दिलं. त्यांच्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं. त्यांच्या सूनेला खासदारकी दिली, पुन्हा मुलीला विधानसभेचं तिकीट दिलं, त्यांच्या पत्नीला महानंदाचं चेअरमनपद दिलं. त्यामुळे नाथाभाऊंना आणखी किती द्यायचं असा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला असेल. शिवाय त्यांना कितीही दिलं तरी ते नावंच ठेवतात. त्यामुळे पक्षाने इतरांना तिकीट दिलं असावं, असा माझा समज आहे, असं पाटील म्हणाले.
