घनकचरा प्रकल्प विनाविलंब करा अन्यथा न्यायालयात जाणार, ‘मनसे’चा रत्नागिरी नगरपरिषदेला इशारा

0

रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, असे न्यायालयाचे आदेश असतानाही अद्याप हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही.
हा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन २० राेजी मनसेतर्फे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे देण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरातील घनकचरा नगरपरिषदेतर्फे प्रतिदिन २० ते २२ टन इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा करून तो साळवी स्टाॅप येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवला जातो. जिथे कोणत्याही प्रकारचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच प्रदूषण होत आहे. या घनकचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण ही होण्याची दाट शक्यता आहे.

डम्पिंग ग्राउंडच्याच शेजारी जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे संकलन वाढत चालले असताना रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन या अतिमहत्त्वाच्या विषयावर उदासीन आहे. हा प्रकल्प दांडेआडोम या ठिकाणी विनाविलंब व्हावा, असे सर्वाेच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरीही नगरपरिषद प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली ही टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

हा प्रकल्प दांडेआडोम येथे विनाविलंब व्हावा, अशी आग्रही मागणी मनसेतर्फे रत्नागिरी नगरपरिषदेकडे केली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी यासंदर्भात एका महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प आपण मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे. नगरपरिषदेने एक महिन्यात हा प्रकल्प मार्गी न लावल्यास नगरपरिषद न्यायालयाचा अवमान करत आहे, असे समजून मनसे न्यायालयात जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितले.

यावेळी राजू पाचकुडे, अॅड. प्रफुल्ल सावंत, जयेश दुधरे, सोम पिलणकर, शैलेश मुकादम, रूपेश चव्हाण, नैनेश कामेरकर, यश पोमेंडकर हे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 21-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here