मुंबई : 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती, मुंबईतही पारा घसरणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. 20 जानेवारीनंतर मात्र, थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम
राज्यात थंडीचा जोर कायम आहे. मात्र, काही भागात किंचित थंडी कमी झाली आहे. त्यामुळं काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही हुडहुडी कायम आहे. आजपर्यंत म्हणजे 26 जानेवारीपर्यंत थंडी वाढणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडी अद्यापही कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा (Cold) जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे, त्या ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
वाढत्या थंडीचा पिकावर परिणाम
एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 26-01-2023