रत्नागिरी : जिल्हा परिषद सेवानिवृतांचे वेतन लवकरात लवकर मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांकडून त्या पेन्शनसाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असं दिसत आहे. एप्रिल महिन्याचे निवृत्तीवेतन अद्यापही मिळालेले नाही. मार्च वेतन मिळण्यासाठी 23 एप्रिलपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांची पंचाईत झाली आहे. याबाबत कोषागार कार्यालयाशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. सेवानिवृत्त हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्रश्नांची दखल त्वरीत करण्यात यावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने आदेश दिले आहेत. घरातील ज्येष्ठमंडळींची काळजी सर्वानी घ्या अशा सुचना दिल्या जात आहेत. ज्या वयोवृध्दांना जुने आजार आहेत, त्यांना जपणे आवश्यक आहे. ह्यदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजाराने अनेक वृध्द ग्रस्त आहेत. त्यासाठी महागडी औषधे लागतात. पेंशन वेळेवर मिळाली नाही तर ती औषधे घेणे शक्य होत नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यांची पेन्शन लवकरात लवकर मिळावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सेवानिवृत्तांची जनसेवा समितीकडून करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
