मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या पर्यायावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उशिरा बोलले मात्र खरं बोलले, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. सगळे देव सध्या लॉकडाऊन आहेत. कारण प्रत्येक धर्म आणि धार्मिक स्थळे हे माणसांवर अवलंबून आहे. त्यांचा पैसा मंदिर, मज्जित अथवा चर्च यांच्या तिजोरीत जातो. जर माणसं जिवंत राहिली तरच मंदिर मज्जित, चर्च किंवा गुरूव्दार यांना किंमत येईल, अन्यथा या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व बेचिराख होईल. कदाचित मंदिरांवर जगणाऱ्याच्या पोटात पोटसूळ उठेल. मात्र सरकारने माणसं जिवंत ठेवली पाहिजेत. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून संकटाच्या काळात राज्यासह देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयकरण करून तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा, हीच संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत मागणी राहिलेली आहे.’
