‘आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागलीय’ : सुप्रिया सुळे

0

मुंबई : आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

त्या सत्यशोधक समाज परिषदेत बोलत होत्या. सत्यशोधक समाज स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित होते. समाजसेवक बाबा आढाव यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे – सुप्रिया सुळे
आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत. दादा पण दौऱ्यासाठी बाहेर जातो आणि मी पण बाहेर जाते. दादा रात्री दीड वाजता आला तर मला कुणी म्हणत नाही की तू संध्याकाळी 7 वाजता ये म्हणून. जेवढा दादाला अधिकार आहे तेवढाच मला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आज मोर्चे निघतात आणि ते सांगतात की लग्न कुणासोबत करायचे. एक दिवस धर्मासाठी द्या म्हणतात. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. UAPA च्या कायद्यांतर्गत हाथरसमध्ये घटनेचं रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला. त्याला 2 वर्ष तुरुंगात घातले आणि त्याला काल सोडण्यात आले. ही माझ्यासाठी मोठी बातमी आहे. परंतु कुठल्या चॅनलला बातमी आली नाही, असेही सुळे म्हणाल्या. काय घालावं? काय बोलावं ? कुणाशी लग्न करावे? हा माझा अधिकार. लग्न कुणाशी करायचं हे जर कुणी मला सांगणार असेल तर मी त्याला विरोध करणार. एखाद्या सिनेमावर एवढं वादळ उठू शकते. आमच्यापेक्षा आमच्या आधीची जास्त प्रगल्भ आहे हे माझं ठाम मत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मूंह में राम दिल में नथुराम – हरी नरके
देशात गोंधळाची परिस्थिती आहे. शेअर मार्केट मध्ये जे घोटाळे होतात ते कसे होतात हे महात्मा फुलेंनी त्यावेळी सांगितले होतं. ज्ञानाची निर्मिती करण्याचे फुलेंचे उदिष्ट होते. तेच करण्यासाठी अशा परिषदेचे आयोजन केले पाहिजेत. शरद पवार मंथन शिबिर घेतात अशा परिषदांची गरज आहे. पंचायतराज घटना दुरुस्तीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा होता. महात्मा फुले यांच्या बद्दल बोलायचे फक्त सामाजिक बोलावं असे नाही. फुले हे म्हणायचे राजकीय सत्ता ही परीवर्तनासाठी उपयुक्त असते. गांधी आणि फुले यांचे नाव तिकडे (भाजप) फक्त नाव घेतात, कृती करत नाहीत. त्यांच्या मूंह में राम दिल में नथुराम असे आहे, असे हरी नरके म्हणाले.

महात्मा फुलेंची दृष्टी ही जागतिक होती. महात्मा फुले यांनी गुलामगिरी वर पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक अमेरिकेच्या निग्रो चळवळीला अर्पण केलं. आजकाल बोलायला गेलं की भीती वाटते. त्यांच्या भावना दुखावतात आणि म्हणातत पाकिस्तानला पाठवा. पाकिस्तानला 2014 नंतर जास्त जागा दिली आहे का? आपल्यातल्या लोकांना तिकडे राहण्यासाठी? तुम्ही स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीत कधी होतात? तुम्ही कधी मालक झाले? कायदा बनवण्याची चर्चा सुरू होती, त्यावेळी काही गुंड घुसले आणि म्हणाले कायदे बनवायचे नाही. जे गुंड घुसले होते ती लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते, असेही हरी नरके म्हणाले.
देशात वातावरण वेगळे आहे न्यायालयावर दबाव टाकला जातो. हे आणीबाणीत घडले नव्हतं. याला रोखायचे असेल शरद पवार आणि बाबा आढाव यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. बाबा आढाव हे महात्मा फुले यांचे रूप आहे आणि शरद पवार हे शाहू महाराजांचे रूप आहे, असेही हरी नरके म्हणाले.

ईडी आमच्या घरी यायचे कारण नाही – बाबा आढाव
स्वातंत्र्य समता बंधुता हा बदल फक्त बोलून उपयोग नाही. याची सुरुवात घरापासून केली पाहिजे. मुलगा आणि मुलगी फरक करता कामा नये. फुले इकडे परत का येऊ शकले नाहीत. कारण माळी समाजाचा त्यांच्यावर बहिष्कार होता. इंदिरा गांधींनी आणीबाणी वापरली आणि आताचे सरकार अदानी आणि आंबनी वापरतात. आमचा आणिबाणीत नंबर लागला. मोदींच्या आणि पवारांच्या भाषणाने काहीही होणार नाही. सत्यशोधक समाज परिषद सामज घडवू शकेल. घर पे तिरंगा आणि घरात संविधान ही घोषणा तयार करा, असे बाबा आढाव म्हणाले. हा देश आपल्याला धर्मराष्ट्र बनवायचा आहे का? घटनेतील भारत? धर्मराष्ट्र बनून पाकिस्तानचे काय झाले? तुम्ही आमदार उचलता आणि नेहता तिकडे आणि आणाता परत. ते अली बाबा 40 चोर सारखे झाले.
ईडी आमच्या घरी यायचे कारण नाही, कारण आमच्याकडे काहीच नाही. 55 वेळा तुरुगांत गेलो आहे. आता 56 वेळा गेलो तर काय फरक पडतो. 93 वर्षी म्हाताऱ्याला उचलले. गांधींनी विचार मांडला पण महात्मा फुले यांनी परखडपणे विचार मांडला. मोहन भागवत असे म्हणाले की ब्राम्हणांनी प्रायश्चित्त घ्यावे. पण ते असं का म्हणाले हे कुणीच विचारले नाही. आम्ही वयाचा विचार करणार नाही. मी आणि पवारसाहेब रस्त्यावर उतरू. पवार साहेब सत्तेत असताना देखील मला अनेकदा अटक केली आहे, असंही बाबा आढाव म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले ?
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाली. विज्ञानावर समाज रचना उभी व्हावी, यासाठी फुलेंनी प्रयत्न केला. फुले आणि शाहू यांच्या नावाने जिल्हा झाला हे महाराष्ट्रात होऊ शकले नाही. कार्यक्रमात शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई यांचे फोटो ठेवा. पण यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे आणि जिजाऊंचा फोटो ठेवा. नुसती शेती करून चालणार नाही, व्यवसाय केला पाहिजे हे फुलेंनी त्यावेळी ठरवलं. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी ही फुलेंनी शोधून सार्वजनिक केली. जुन्नर आंबेगाव या भागातील शेतकऱ्यांनी लोकांनी जोतिबा फुलेंना महात्मा पदवी दिली. फुले हे देवाला मानत नव्हते असं नाही. देव आणि त्याच्यातील मध्यस्त त्यांना ते मानत नव्हते. नव्या पिढी पुढे हा इतिहास ठेवला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 06-02-2023