चिपळूण : गुरुवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने चिपळुणात मोठे नुकसान झाले आहे. शहरातील काही घरांना याचा तडाखा बसून घरावरील पत्रे उडाले. गोवळकोटमधील गणपत हरवडे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शहरातील मार्कंडी येथील जनता हॉटेलच्या मागे असलेल्या रस्त्यावरील मोरी बंद असल्याने तुंबलेले पाणी शैलता कदम यांच्या घरात शिरल्याने नुकसान झाले. तसेच टेरव येथील रवींद्र कदम यांच्या घरावरील पत्रे उडाले. नांदिवसे येथील बाबू मोरे यांच्या घराचेही नुकसान झाले. कालुस्ते येथील सुलोचना धोंडीराम कदम यांच्या घरावरील पत्रे उडाले. गोवळकोट येथील तुकाराम गोविंद निवाते यांच्या घराचे नुकसान झाले. या शिवाय महावितरणचेही मोठे नुकसान झाले असून नुकसानाची माहिती तहसील कार्यालयातर्फे नोंदविण्याचे काम सुरू आहे.