रत्नागिरी : केंद्र सरकार कोरोनाच्या यशस्वी सामना करत देशवासीयांचे जनजीवन सुरळित करण्याचे जोरदार प्रयत्न करत असताना महाराष्ट्र सरकार ही परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे, अशी टीका भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली. कोरोनाच्या संक्रमण काळात देशवासीयांना दिलासा देण्याचे काम केंद्र सरकार करत असताना राज्य सरकार मात्र साफ अपयशी ठरल्याचे दिसत आहे. इतर राज्यांप्रमाणे आपल्या नागरिकांना आणण्याकरिता, राज्यांतर्गत अडकलेल्या नागरिकांच्या वाहतूक व्यवस्थेकरिता कोणतीही ठोस उपाययोजना राज्य सरकारने केल्याचे दिसून येत नाही. विशेषकरून कोकणाकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे. कामानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईत असणाऱ्या कोकणवासीयांचे यामुळे मोठे हाल झाले आहेत. मुंबईत पुरेशा जीवनावश्यक सोयी नाहीत, तर गावी येण्यासाठी नियोजनद्ध व्यवस्था नाही, अशी टीका डॉ. नातू यांनी केली.