सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला..

0

मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्यात शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आपल्यासोबत सुमारे ७५ टक्के आमदार घेऊन ठाकरे गटाची साथ सोडून बाहेर पडले. त्यानंतर अखेर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली असून त्यावर आज सुनावणी झाली.

या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. पण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट केले. त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेना खोचक टोला लगावला.

“सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठव्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचं ते आम्ही ठरवू, असंही न्यायालयाने नमूद केले. अशा वेळी आम्हालाही असंच वाटतं की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर निकालच लागू नये हे त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण होतं. पण सध्या त्या धर्तीवर निकाल आला आहे. आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 17-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here