रत्नागिरी : राज्याच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्थापना दिन साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि रत्नागिरी पालिकांचा स्थापना दिन एक एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात एक एप्रिल १८७६ रोजी अस्तित्वात आलेल्या या दोन्ही पालिकांच्या स्थापनेला यंदा १४७ वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांनंतर या दोन्ही पालिका शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहेत. राजापूर पालिका अस्तित्वात येण्यासाठी १८७४ पासून प्रयत्न सुरू झाले होते. प्रत्यक्षात १८७६ मध्ये त्याला मान्यता मिळाली. राजापूरच्या जुन्या म्युनिसिपल कौन्सिलचे अर्थात पालिकेचे कार्यालय बाजारपेठेतील मालपेकर बिल्डिंग येथे होते. नोटीफाइड एरिया कमिटीचे अस्तित्वदेखील त्या काळात होते. प्रशासकीय पातळीवर १९३९ मध्ये २३ स्वीकृत सदस्यांची नेमणूक पालिकेवर करण्यात आल्याची नोंद आहे. नगराध्यक्षपद लोकनियुक्त होते. स्वीकृत सदस्यांमधून निवडून आलेले नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदाच्या व्यक्तीची निवड करीत होते.
या पालिकांचा स्थापना दिन साजरा करण्यासाठी नियोजन सुरू आहे. दोन्ही पालिकांवर सध्या प्रशासकीय राजवट आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 22-02-2023