रत्नागिरी : कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि तोंडावर आलेल्या पावसाळ्यातील उपाययोजनांबाबत घेण्यासह इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी सर्वसाधारण सभा घेण्याची विनंती भाजप नगरसेवकांनी केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना यासंदर्भात सर्व नगरसेवकांचे सहयांचे निवेदन देण्यात आले असल्याचे शहर अध्यक्ष सचिन ऊर्फ अण्णा करमरकर यांनी सांगितले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्व रहिवासी इमारती, बाजारपेठा व गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज केली पाहिजेत. शहरातील सर्व गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची आवश्यकता आहे. चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी माफ करण्याची विनंतीही भाजपकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. अशा व इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. ही सभा घेतली जावी यासाठी भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर, राजेश तोडणकर, सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, प्रणाली रायकर यांच्या सहीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.