रत्नागिरी : राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यात तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूर परिस्थिती निवळताच करण्यात येणार आहे. पावसामुळे राज्यातील अनेक भागात बिकट परिस्थिती असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो.याकाळातमहावितरणच्यावतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
