भाट्ये खाडीचा फणसोप परिसर गाळाने भरला

0

◼️ ओहोटीच्यावेळी होडी जाणेही मुश्किल, वेळीच दखल न घेतल्यास समस्या गंभीर होण्याची भीती

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीमध्ये येणाऱ्या फणसोप परिसराचा काजळी नदीला जोडणारा भाग गाळाने भरला आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी येथून होडीही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या, खाड्यांमध्ये गाळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात भाट्ये खाडीचा काही परिसर गाळाने बुजणार आहे. त्यामुळे येथे खाडीच होती की नाही, अशी परिस्थिती उत्पन्न होणार आहे. त्यामुळे शासनाने या गाळ्याच्या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

भाट्ये खाडीचा बहुतांश भाग गाळाने भरल्याचे ओहोटी काळात दिसते. खाडी परिसर गाळाने भरल्यामुळे आता कालवे, शिंपले तसेच मासेही मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गाळाचे दुष्परिणाम आतापासून दिसू लागले आहेत. भाट्येचा पुढील भाग असलेल्या जुना फणसोप, नवा फणसोप या गावांच्या समोरील भाट्ये खाडीचा भाग गाळाने भरल्याचे दिसून येते. त्यामुळे समुद्राला ओहोटीच्या वेळी गाळ भरल्याचे दिसून येते. फणसोप गावाच्या समोर असलेल्या बेटावर ओहोटीनंतर भरलेल्या गाळावरून पलीकडे चालत जाता येते. त्यामुळे भविष्यात संपूर्ण भाट्ये खाडीच गाळाने भरणार, अशी भीती मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता फणसोप येथील गाळाचा प्रश्नही गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच फणसोप परिसरातील गाळ लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 09-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here