रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल. ठेकेदार प्रवृत्तीचे लोक ग्रामीण राजकारणात आहेत. यामुळे विकासात अडथळे येत आहेत, असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मांडले.
गोताडवाडी (ता. संगमेश्वर) येथे धनीण देवी सेवा मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त आयोजित सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, ग्रामपंचायत कारभारात तरुणांनी लक्ष घातले पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य दुर्दैवाने अनेक लोकांना माहीत नसतात, अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे. कोणीतरी पैसेवाला येईल आणि आपल्या ग्रामीण भागात एखादा रस्ता पाखाडी करून देईल, अशा पद्धतीची मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावांच्या विकासाला चालना दिली पाहिजे. गावागावात असणारी गटबाजी ज्या दिवशी मोडीत निघेल, त्या दिवशी गावांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला असेल. ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. एका गावात तीन, चार राजकीय गट असल्यानेच गावाचा विकास होत नाही. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
गेल्या दोन वर्षांत नळपाणी योजना, रस्ते विकासातील अडचणी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत मोर्डे-करंबेळे ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांचे श्री. खंडागळे यांनी कौतुक केले.
यावेळी गावचे गावकर राजेश तुकाराम गोताड, अध्यक्ष उदय गोताड, डॉ. मंगेश कांगणे, गोताडवाडीतील सांगली, मुंबईमधील ग्रामस्थ उपस्थित होते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 13-03-2023