रत्नागिरी : सांगली कोल्हापुरात आलेल्या पुराने संपूर्ण जनजीवन उध्वस्थ झाले. माध्यमातून या पुराची भीषणता देशभरात पोहचत होती. त्यांचे दुःख हे आपले दुःख या भावनेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वजण धावले. अनेक ठिकाणाहून उत्स्फूर्तपणे मदतीच्या रूपाने जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भागात रवाना झाल्या. असे असताना एक ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये असे सांगण्यात आलंय कि मदत योग्य व्यक्तीपर्यंत न पोहचल्याने हाच मदतीचा माल साठवून काहीजण धंदा करू लागले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मदत येत आहे कि ती आता थांबवा. त्याचे नियोजनबद्ध वाटप होणे देखील तितकेच गरजेचे आहे असे या ऑडीओ क्लिप मधून सांगण्यात आलं आहे. हि क्लिप नेमकी कुणाच्या आवाजातील आहे याबाबत सत्यता आम्ही जरी तपासली नसली तरी मदत वितरीत करताना ती गरजूंना मिळते कि नाही याची देखील खात्री करणे आवश्यक आहे.
