एसटी प्रवासात महिलांना 50% सूट, जाणून घ्या नियम-अटी…

0

मुंबई : अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या.

आणि अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून जी आर आला. आता महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत मिळाली, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? हा सगळ्या प्रश्नांची उत्तर सविस्तर जाणून घेऊ.

राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे.

सवलतीचे नियम व अटी
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट, आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये 50 टक्के सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.

प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार.

या सवलतीत तुम्ही राज्यभर कुठेही फिरू शकता.. मग पुणे, मुंबई, सातारा, सांगली, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता, मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार…म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
आता लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही, म्हणजे तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही.

यामध्ये महिला रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही, म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगे हात तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.. यात महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा मिळणार नाही.

5 ते 12 वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत म्हणजे हाफ तिकीटदर आकारला जाईल.

75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार. यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here