मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ८ मे रोजी पत्रकार परिषद घेतली आणि फक्त शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. कोरोनाचं संकट कमी झालं नाही तर २० जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत निर्णय होईल, असं सांगितलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना ग्रेड देऊन पास करावं, अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) केली. शिक्षणमंत्र्यांच्या या मागणीमुळे त्यांनी आपल्याच भूमिकेला छेद दिला. या मागणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे, अशी टीका अभाविपने केली आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये, असं निवेदन अभाविपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केलं आहे. कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी अभाविपने केली आहे.