राजापूर : कोल्हापुरात आलेल्या महापुरात येथील राजापूर हायस्कूल मार्फत दहा दिवसांपूर्वी एनसीसी कॅम्पसाठी गेलेले २२ विद्यार्थी पूर परिस्थितीमुळे तेथेच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना कॅम्प चार दिवसांपूर्वीच संपलेला आहे. हे विद्यार्थी आर्मी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. त्यांची व्यवस्थाही उत्तम आहे. मात्र दहा दिवसांपूर्वी घरातून गेल्याने व कॅम्प संपल्याने या विद्यार्थ्यांना घरची ओढ लागली असली तरी पूर परिस्थितीमुळे वाहतुकीची सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना तेथेच अडकून पडावे लागले आहे. राजापूर हायस्कूलचे विज्ञान, क्रीडा व एनसीसी शिक्षक विकास कुंभार यांच्यासमवेत हे विद्यार्थी या कॅम्पसाठी गेलेले आहेत. आर्मी कॅम्पमधून पूरग्रस्तांना मदतकार्य केले जाते. सध्या विकास कुंभार यांच्यासमवेत हे विद्यार्थी या मदतकार्यात सहभागी झाले आहेत. यामुळे संकटग्रस्तांना मदत करणे ही भावना विद्यार्थ्यांत रूजण्यास मदतच होत असून या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव देखील घेता आला आहे. दरम्यान एनसीसी शिक्षक श्री. कुंभार यांना शनिवारी हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी खाण्याची पॅकेटस तसेच पाणी वाटपाची सेवा करण्याची संधी मिळाली.
