चिपळूण : चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीमध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. तो काढण्यासाठी तांत्रिक मंजुरी देण्याची मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ काढला गेला नाही, तर पावसाळ्यात शहरात पाणी भरून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गाळ उपसण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. गाळ काढण्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली पाहिजे. येत्या पावसाळ्यात शहरामध्ये पाणी शिरून लगतची बाजारपेठ, बस डेपो, शाळा, कॉलेज परिसरात नुकसान होऊ शकते. गेल्या पावसाळ्यात नदीचे पाणी शहरात घुसून नुकसान झाले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी या नदीमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला त्वरित तांत्रिक मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात निकम यांनी नमूद केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:05 PM 25-May-20