रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अद्यापही राज्य शासनाने जिल्हा बंदी कायम ठेवली आहे. विविध राज्यात अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाकडून विशेष प्रवासी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहेत. रेल्वेच्या काही विशेष प्रवासी फेऱ्या सोडण्यात आल्यामुळे परराज्यात काम करणारे कामगार गावाकडे परतू लागले आहेत. दरम्यान, दिल्ली ते मडगाव राजधानी एक्स्प्रेसमधून शनिवारी सुमारे सव्वासहाशे लोक रत्नागिरी स्थानकात उतरले. या प्रवाशांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे. या गाडीला मोजकेच थांबे आहेत. या सर्व प्रवाशांना रत्नागिरीतून पुढे जाण्यासाठी एसटी बससेची व्यवस्था करण्यात आली होती.