बारावीनंतर बीएड करण्याचे धोरण येण्याची शक्यता
रत्नागिरी : नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता बारावीनंतर चार वर्षाचा इंटिग्रेटेड बीएडचा डिग्री कोर्स करावा लागणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचा डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार अंमलबजावणी झाली तर जिल्ह्यातील २ अनुदानित आणि २ विनाअनुदानित कॉलेजला टाळे लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी शिक्षक होणे खूप प्रतिष्ठेचे मानले जात होते. बारावीनंतर डीएडचा कोर्स केल्यानंतर नोकरीही मिळत होती. डीएडचा कोर्स करून अनेकजण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यामुळे या क्षेत्रात येण्याचा कल वाढला. परिणामी राज्यासह जिल्ह्यात डीएडची महाविद्यालये सुरू झाली. त्यामध्ये खासगी आणि विनाअनुदान तत्वावरील महाविद्यालयाचा समावेश आहे.
डी. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली असायची. मात्र गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे हजारों तरुण-तरुणींनी डीएडच्या पदवी घेऊन घरात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी झाला. काही कॉलेज बंद झाली.
जिल्ह्यात डीएडची २ अनुदानित आणि २ विनाअनुदानित अशी एकूण ४ महाविद्यालये आहेत. भरणे, सावर्डे येथे विनाअनुदानित तर रत्नागिरी, राजापूर येथे अनुदानित महाविद्यालये आहेत. या ठिकाणी एकूण २५० प्रवेक्ष क्षमता आहे. यातील अनेक जागेवर प्रवेश झाला आहे. जवळपास १५० मुले आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला दोन वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तसेच चार वर्षांची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड फोर्स शिक्षक होण्यासाठी करता येणार आहे.
दरम्यान, भविष्यात शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा, त्याबसोबत नव्या गोष्टींचा या इंटिग्रेटेड कोर्समध्ये समावेश केला असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 10/Apr/2023