लांजा : तालुक्यातील वेरळ येथील होम क्वारंटाईन असलेले दोघेजण बेपत्ता झाल्याने, तालुका प्रशासनाने याचे खापर ग्राम कृती दलावर फोडले होते. या प्रकरणी बेपत्ता झालेल्या दोघांसह वेरळ ग्राम कृतीदलावर कारवाईची नोटीस बजावली होती. या भूमिकेमुळे सरपंच संघटना आणि सर्व कृती दलातील सदस्य आक्रमक झाले होते. मात्र, या घटनेत वेरळ ग्रामकृती दलाला जबाबदार ठरवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला केल्या आहेत. या प्रकरणी आ. राजन साळवी यांनी जातीनिशी लक्ष घालून ग्राम कृतीदलांवर अशा पद्धतीने कारवाईचा बडगा उभारणे चुकीचे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणी बेपत्ता झालेल्या दोघांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.