मंडणगड : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून या दुर्गम तालुक्याकडे लक्ष देण्यासाठी उपविभागीय अधिकारी दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. येथील प्रत्येक गावापर्यंत वैद्यकीय सुविधा पोचाव्यात, कोरोना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा पाठपुरावा करता यावा, तालुका प्रशासनाला अनुभवी अधिकारी मिळावा, यासाठी येथे उपविभागीय दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, असे पत्र डॉ. नातू यांनी पाठविले आहे.