रत्नागिरी : कोरोना संकट काळात मुंबई-पुणे येथून कोकणात आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केले आहे. त्यांना मोफत व्यावसायिक शेतीविषयक सल्ला देण्याची तयारी या समितीने दर्शविली आहे. कोरोनाच्या काळात कोकणात जे तरुण मुंबई-पुण्यातून आले आहेत आणि ज्यांनी क्वारंटाइनचा काळ पूर्ण केला आहे, अशा तरुणांनी शहरात परत जायला वेळ असेल, तर आपापल्या गावी व्यावसायिक शेती आणि इतर पूरक व्यवसायात लक्ष घालावे. कुटुंबासह आपल्या भागाच्या आर्थिक विकासात पुढाकार घ्यावा, असे आवाहन गाव विकास समितीचे संघटनप्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे. कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी येथे व्यावसायिक शेतीला चालना मिळणे आवश्यक असून ज्या प्रयोगशील तरुणांना शेतीचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना गाव विकास समितीचे कृषी तज्ज्ञ राहुल यादव यांच्यामार्फत फोनवरून मोफत व्यावसायिक शेतीचा सल्ला देण्यात येणार असल्याचेही श्री. खंडागळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी 9689163748 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.