रत्नागिरी : मागील काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून येथील अनेक रहिवाशांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पुरग्रस्तांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडून योग्य ते सहाय्य करण्यात येईल, असे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगतिले. यासंदर्भात १५ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेक घरांचे, दुकानांचे, रस्ते, साकव, पुल, गुरे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधित खात्याकडून माहिती घेतली. यामध्ये जिल्ह्यातील पावसामुळे रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, खेड, लांजा, राजापूर आदी तालुक्यात झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. आवश्यकता वाटल्यास मुंबईहून आवश्यक ती मदत पाठविण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. पूरग्रस्तांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या तसेच येथील रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी, जिल्हाधिकारी तसेच आरोग्य अधिकारी यांच्या समवेत चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिपूर्ण आढावा घेण्यात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत १५ ऑगस्ट रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आढावा घेतल्यानंतरच विविध तालुक्यांचे विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन त्या त्या तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेतही चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
