रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर) येथील रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांची सुटका करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली.
प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरू असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
बारसू पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील गावागावात ग्रामस्थांकडून निषेधार्थ फेऱ्या काढल्या जात आहेत.
अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी आंदोलकांनी शांततेत उपोषण केले. यावेळी इतर गावातल्या लोकांना उपोषणस्थळी पोहोचण्यास प्रशासन मज्जाव करत असल्याचे बारसू शेतकरी ग्रामस्थांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मातीपरीक्षणाचे काम सुरू आहे. त्याला स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड विरोध सुरू आहे. बारसूच्या सड्यावर रिफायनरी उभारणार असल्याने प्रकल्पविरोधक आक्रमक झाल्याचे मागील काही दिवसांत पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि इतर ६ जणांना पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळे आणल्याच्या ३५३ कलमाखाली झालेल्या या अटकेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील प्रत्येक गावागावात निदर्शने केली जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 10-05-2023
